पाण्याचे दुर्भिक्ष अन् आठवण...
कालच्या बातम्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष ऐकले. सध्या फार मोठा प्रश्न निर्माण होतो आहे. पाण्याचा साठा पंचवीस टक्क्यांपर्यंत आलेला.
आणि सहज आठवले आपलं बालपण...
बालपणी ओढा बारामाही वाहायचा. त्या पाण्यातून जाता येता आनंद वाटायचा. ओढ्याचे पाण्याने पायाला गुदगुल्या केल्यासारखं वाटायचं. ते पाणी नितळ असायचं. खोलपर्यंत सर्व काही नजरेत भरायचे...
नदी तुडुंब भरून वाहत असायची. भर उन्हाळ्यात "नंदीमोड" या खोलगट पाण्यात पोहताना मजा यायची. थंडी लागली की गरमागरम वाळू...मग त्यावर लोळायचं..आनंद घ्यायचा...पुन्हा पाण्यात पोहायचं...असा क्रम असायचा...
तहान लागली की "गु़ंडगा" मधील वाहतं पाणी जनावरासारखं तर कधी ओंजळीने प्यायचे.
गुंडगा म्हणजे ओढ्याच्या काठी तसेच नदीच्या काठी खोलगट खड्डा असायचा. त्यामध्ये एकदम स्वच्छ पाणी जमा व्हायचे...ते आजचे फिल्टर पाणी..आणि आज आपण तसे पाणी बंद बाटलीतून घेतोय...
१९८९ ला स्वामी विवेकानंद महाविद्यालयात रूजू झालो. त्याचं वर्षी अकरावीला भास्कर चंदनशिव यांचा पाणी हा पाठ शिकवत होतो. ग्रामीण भागातील पाणी...ओढे..नदी.. स्वच्छ पाणी पिण्याची त्याकाळची सोय. अशी सहज माहिती सांगत असताना पिण्याचे पाणी गु़ंडग्यातून आणतात. असे म्हणताच सर्व विद्यार्थी माझ्याकडे पहात होते.मी म्हणालो,
" गुंडगा" माहित नाही का?".
" सर, आम्हाला माहित नाही हा शब्द ".
" अरे, नदीच्या किंवा ओढ्याच्या काठी एक खड्डा पाडला जातो. आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी जमा होते. आणि ते पिण्यासाठी वापरतात ".
" सर, आमच्याकडे " चलमा" म्हणतात". हे ऐकताच आश्चर्यचकित झालो. आणि कळले की भाषा ही कोसावर बदलते..
हे सहज आठवले....
मग "कृषी शब्दधन" हे पुस्तक पुन्हा एकदा हाती घेतले...
द. मा.माने-बेडगेकर.
शिरूर ताजबंद ता अहमदपूर.
9403866651..9421371501
Comments
Post a Comment